
मध्यंतरी एक बातमी वाचली. केरळ येथील एका व्यक्तीने वनस्पतींचा अभ्यास करून एक तेल तयार केले आहे. १५ दिवसातून एकवेळा फक्त १० मिनिटे ह्या तेलाने टकलावर ६ महिने सतत मालिश केल्यास टक्कल नाहीसे होते, हा नवीन शोध. देशातील सर्वोच्य अश्या वैज्ञानिक संस्थेने ह्या तेलाचा शास्त्रीय अभ्यास करून हे तेल अतिशय परिणामकारक असल्याची आणी ह्या तेलाच्या मालिश चा आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नसल्याची ग्वाही दिली. बातमी वाचून एक विचार आला? खरोखर तरुणांना पडणारे अकाली टक्कल, एक आरोग्यविषयक किंवा सामाजिक समस्या असेल काय? आणी असल्यास ह्यावर एखादा राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविणे शक्य होईल काय? बराच अभ्यास केल्यानंतर ही समस्या किती गंभीर आहे ह्याची माहिती मिळाली, त्यातील काही निष्कर्ष:
१. अकाली टक्कल - तरुणांमध्ये निर्माण होणारया मानसिक विकृतीचे महत्वाचे कारण. टक्कल असणारे तरुण जेव्हा सुंदर केस असणारया आपल्या मित्रांसोबत तुलना करतात, त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारचा मानसिक न्यूनगंड निर्माण होतो.
२. विवाहाकरिता मुलीने नकार दिलेल्या अनेक कारणांपैकी, तरुणाला असलेले टक्कल हे एक अतिशय महत्वाचे कारण.
३. केवळ टक्कल असल्यामुळे, शिक्षित असूनही तथा आवश्यक सर्व कौशल्य असूनही, नौकरी न मिळाल्याची अनेक उदाहरणे.
४. टक्कल असल्यामुळे त्यांना सतत हिणवत असल्यामुळे, समाजावरील त्यांचा राग आणी त्यातून असामाजिक आचरणाकडे वळण्याची त्यांची वृत्ती.
५. मुंबई येथील एका अभ्यासाचा निष्कर्ष: रस्त्यांवरील अपघातात मृत्त्यू पैकी ६५% टक्कल असणारे (केसांचे आच्छादन नसल्यामुळे हेड इंज्युरीचा जास्त धोका)
६. विवाहित टक्कल असणारया तरुणाला त्याची पत्नी सतत हिणवत असते, प्रणयाचे वेळी तिला त्याच्या केसातून हात फिरविण्याची संधी मिळत नाही .. ह्यातून निर्माण होणारा दुरावा.
७. अर्धवट टक्कल, डोक्यावर थोडेसे केस, आणी ह्या केसांनी सतत टक्कल झाकण्याचा प्रयत्न. त्यामुळे सतत कामाकडे होणारे दुर्लक्ष. किंवा, टक्कल झाकण्यासाठी विगचा वापर, त्याचे वेगळेच टेन्शन (माझ्या एका मित्राचा विग मोटारसायकल चालविताना उडून गेला आणी मागे उभ्या असलेल्या गाई ने खाल्ला)
८. एका अभ्यासाचा निष्कर्ष: ३२% युवकांना अकाली टक्कल
म्हणजे, ही एक निश्चितच आरोग्य विषयक समस्या ठरू शकते. शिवाय, ३२% युवकांना अकाली टक्कल, ह्याचा दुष्परिणाम कंगवे, शाम्पू , तेल ह्यांच्या विक्रीवर. देशाचे आर्थिक नुकसान. म्हाल्यांच्या धंद्यावरही विपरीत परिणाम. आणी, ह्या सर्व विचारातून, अभ्यासातून निर्माण झाला एक राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम " राष्ट्रीय अकाली टक्कल उपचार कार्यक्रम". ह्या कार्यक्रमाची अंमलबजावणीची थोडक्यात रूपरेषा:
१. राष्ट्रीय लसीकरण कार्याक्रसोबातच हा कार्यक्रम राबविला जाणार (कारण लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी १५ दिवसातून एक वेळा गावात जात असतात).
२. जनगणनेच्या वेळी टक्कल असणारया तरुणांची गणना (पूर्ण टक्कल, अधर्वट टक्कल ह्यांचे वर्गीकरण).
३. आरोग्य सेविकेला तेलाचा पुरवठा (वापरा आणी फेका ह्या तत्वावर असणारया १० ml च्या कुप्या).
४. लसीकरण सत्राचे वेळी टक्कल असणारया तरुणांनी येण्याकरिता मोठ्या प्रमाणात आरोग्य शिक्षण मोहीम ( ह्या करिता उत्कृष्ठ घोषवाक्क्ये तयार करणार्यांना विशेष बक्शिश - विचार करा आणी सुचवा चांगली घोषवाक्क्ये) .
५. लसीकरण सत्राचे वेळी १५ दिवसातून एकदा येणाऱ्या टक्कल असणारया तरुणांची आरोग्य सेविकेद्वारे तेलाने १० मिनिटे मालिश. मालिश करण्याकरिता आपल्या मैत्रिणीला आणण्याची तरुणांना मुभा. विवाहित टकले त्यांच्या पत्नी सोबत येतील, सोबत मुलानाही लसीकरणासाठी आणतील)
(थोडा वेळ डोळे बंद करून वरील चित्र आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करा - आहा हा - काय सुंदर चित्र - स्त्रिया मुलांना पोलियो, ट्रिपल च्या लसीकरणासाठी घेवून आलेल्या आहेत, लसी करणानंतर मुले खेळत आहेत, टकल्या नवर्यांना बायका डोक्यावर तेल चोळत आहेत, आरोग्य सेविका काही टकल्या तरुणांचे मालिश करीत आहेत (ह्या प्रसंगातून ह्या टकल्यानंचे आणी आरोग्य सेविकेच्या विवाहाचे योग जुळून येण्याची शक्यता) , काही अविवाहित टकले आपल्या प्रेयसी सोबत आलेले आहेत, कोपर्यात जावून प्रेयसी त्यांना मालिश करीत आहे ...)
राष्ट्रीय अकाली टक्कल उपचार कार्यक्रम - फायदे:
१. लोकांच्या गरजांवर आधारित एकमेव उपचारात्मक कार्यक्रम (बरेच राष्ट्रीय कार्यक्रम प्रतिबंधात्मक आहेत)
२. मालिश चा फायदा दिसत असल्यामुळे, लोकांचा आरोग्य सेवेवरील विश्वास वाढेल, त्यामुळे, इतर आरोग्य कार्यक्रम देखील यशस्वीरीत्या राबविले जातील.
३. उपचार कार्यक्रमामुळे, तरुणांमधील नैराश्यतेचे तथा मानसिक आजारांचे प्रमाणात कमी, असामाजिक आचरणाकडे वळण्याच्या वृत्तीत बदल.
४. मालिश करण्यासाठी तरुण मुलीनी पुढाकार घेतल्यास, प्रेम विवाह आणी हुंड्याचे प्रमाण कमी होण्यास मदत.
५. कंगवे, शाम्पू, तेल ह्यांच्या विक्रीत वाढ होवून देशाची आर्थिक उन्नती.
६. टक्कल नाहीसे झाल्यामुळे अधिक उमेदीने कामावर लक्ष केंद्रित, राष्ट्राच्या विकासात हातभार.
७. तेलाच्या निर्मितीचे गृहउद्ध्योग कारखाने - त्यामुळे राष्ट्राच्या आर्थिक विकासाला हातभार.
टीप: हा लेख वाचून, राष्ट्रीय कार्यक्रमाच्या नियोजनात, अंमलबजावणीत अभिनव कल्पना सुचविणाऱ्या वाचकांना राष्ट्रपती तर्फे पारितोषक दिले जायील.
ताजा कलम: तेलाच्या खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा तथा ह्या तेलाच्या परिणामकारकतेबद्धल विरोधी पक्षांनी आरोप केल्यामुळे, सध्या भारत सरकारने हा कार्यक्रम सुरूच केलेला नाही. कृपया लेख वाचून नाहकच गंभीरपणे विचार करू नका, शिल्लक असलेले केस गळून पडतील.
