Tuesday, March 29, 2011

प्रसंगावधान


१९७९ मध्ये मी नागपूर जिल्ह्यातील कचारीसावंगा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी ह्या पदावर कार्यरत होतो. डॉ. सपकाळ आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी. एक वादग्रस्त व्यक्तिमत्व, पण खऱ्या अर्थाने व्यवस्थापन कौशल्य शिकावयाचे झाल्यास त्यांचे कडून शिकावे असे डॉ. सपकाळ. वेळप्रसंगी प्रशासनातील कायदे, नियम बाजूला सारून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सतत मदत करणारे. त्यांचे दौरे मात्र संध्याकाळचे. संध्याकाळी ४-५ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रात २-३ मित्रांसोबत येणार, कामाची तपासणी, चर्चा केल्यानंतर मुक्काम करणार आणी दुसऱ्या दिवशी सकाळी नागपूरला परत जाणार. एकदा असेच सकाळी नागपूरला परत जाताना मलाही काही काम असल्यामुळे त्यांचेसोबत जाण्याची त्यांना विनंती केली आणी त्यांचेसोबत नागपूरला निघालो. त्याकाळी जिल्हा आरोग्य अधिकार्याची पांढरी raunold कार सर्वाना माहित असावयाची. कारण इतर सर्व जिल्हा स्थरावरील अधिकाऱ्यांच्या वाहनापेक्षा ही कार एक वेगळीच होती. काटोल मार्गे आम्ही नागपूर ला जाण्यास निघालो. रस्त्यात कळमेश्वर हे प्राथमिक आरोग्य केन्द्र आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात आणी रस्त्यावर २००-३०० माणसांची गर्दी. जिल्हा आरोग्य अधिकार्याची पांढरी कार बघून लोकांनी वाहन अडविले. स्थानिक वैध्यकीय अधिकार्याच्या विरोधात नारेबाजी सुरु केली. ही सर्व परिस्थिती का घडली त्याची पार्श्वभूमी:रात्री गावातील एक महिला प्रसुतीकारिता रुग्णालयात दाखल झाली. सकाळी तिची प्रसूती झाली आणी प्रसुतीनंतर तिला खूप रक्तस्त्राव सुरु झाला. वैध्यकीय अधिकार्यांनी तपासून काही जुजबी उपचार सुरु केलेत आणी अर्ध्या तासानंतर रक्तस्त्राव खूप प्रमाणात सुरूच असल्यामुळे आणी रुग्णाची सर्वसाधारण स्थिती गंभीर होत असल्यामुळे रुग्णांच्या नातेवायीकाना तिला तत्काळ नागपूर येथील वैध्यकीय महाविध्यालयात पुढील उपचारासाठी घेऊन जाण्याच्या सल्ला दिला. दुर्दैवाने त्यापूर्वीच रुग्णाचा मृत्त्यू झाला. थोड्याच वेळात १०-१२ लोक जमा झालेत. जनसमुदायाची नेहमीच आढळणारी मानसिकता. कोणत्याही परिस्थितीची शहानिशा न करता, डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे ही स्त्री दगावली, ही चुकीची बातमी वार्यासारखी गावात पसरली. १५-20 मिनीटातच १५०-२०० लोक गोळा झालेत. डॉक्टरच दोषी, मारा त्यांना, जाळून टाका हे केन्द्र, ही चर्चा आणी समुदायाची मानसिकता अधिकच भडकत गेली. डॉक्टरांनी घाबरून स्वतःला एक खोलीत कोंडून घेतले. दवाखान्यावर दगडे मारून काचा फोडल्या गेल्यात. आणी तेव्हाच आम्ही तेथे पोहचलो होतो. डॉ. सपकाळ हे जमावाच्या मध्यभागी गेलेत. कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जमाव साहजिकच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तेवढ्यात २-३ लोकांनी रॉकेल च्या डबक्या देखील आणल्यात. बस.. जला दो, जला दो च्या घोषणा ऐकत येत होत्या. तेवढ्यात २-४ लोकांनी नारेबाजी सुरु केली, हे अधिकारी आता त्यांच्याच अधिकार्याला पाठीशी घालणार. "उनकी गाडी भी जला दो" जोर जोऱ्यात घोषणा सुरु झाल्यात. तेवढ्यात पोलीस ची गाडी ४-५ पोलिसांसह दवाखान्याच्या आवारात शिरताना दिसली. पोलिसांना बघून लोकांना अधिकच उधान आले, घोषणाबाजी सुरूच होती. आणी मग डॉ. सपकाळ ही काय चीज आहे ह्याची चुणूक दिसली. सर्वप्रथम त्यांनी पोलीस आणी त्यांची गाडी दवाखान्याच्या आवाराच्या बाहेर नेण्याचे आदेश दिलेत. एका माणसाच्या हातून रॉकेल चा डबा हिसकला, आणी कोणाच्याही लक्षात येण्यापुर्वीच स्वतःच्या गाडीवर आणी दवाखान्याच्या बाहेरील भिंतीवर डब्यातील रॉकेल भिरकविण्यास सुरवात केली. आणी आपल्या वाहन चालकास म्हणले " आन रे काडी पेटी, मीच प्रथम आग लावतो. लोकांना कळलेच नाही काय होतंय ते, क्षणात नारेबाजी थांबली. मग त्यांनी बोलण्यास सुरवात केली. त्या दुर्दैवी स्त्रीच्या मृत्यूस जर डॉक्टर जबाबदार असतील तर ह्या रुग्णालयाला मीच आग लावतो, तुम्ही कशाला तसदी घेता. नंतर, पोलीस इन्स्पेक्टर ला बोलावले, आतून डॉक्टर ला बाहेर काढले, पोलिसांना आदेश दिलेत, ह्या डॉक्टर विरुद्ध गुन्हा नोंदवून तत्काळ ह्यांना नागपूर ला पोलीस मुख्यालयी घेवून या. मला म्हणले, "देवा, १ तासात संपूर्ण निपक्षपाती चौकशी कर, कर्मचाऱ्यांचे, नातेवायीकांचे statements घे, आणी सर्व अहवाल तयार कर, तो पर्यंत मी येथेच थांबतो. लगेच नागपूर ला फोन करून वरिष्ठ अधिकार्याशी बोललेत. जमावाच्या मध्य भागी खुर्ची टाकून बसलेत आणी तेथेच स्थानिक लिपिकास डॉक्टरांचे निलंबनाचे आदेश टाईप करून आणण्याची सूचना दिली. स्वतःला अधिकार नसताना देखील ह्या आदेशावर स्वाक्षरी केली. सोबतच जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत येत आहे हे बघून त्यांचेही प्रभोदन करण्यास सुरवात केली. जमाव हळू हळू शांत झाला आणी ३० मिनीटातच जमावाची पांगापांग झाली. कधीही कल्पना देखील करू शकणार नाही असा हा मला आलेला अनुभव.२ तासानंतर आम्ही नागपूरला जाण्यास निघालो. मी म्हणलो, "सर, चौकशी अंती मला तरी डॉक्टर चा काहीच दोष दिसत नाही. उगाच आपण त्यांना निलंबनाची शिक्षा दिली आणी पोलिसांच्या गाडीत नागपूरला पाठविले" सर म्हणले, "जमावाला विवेकबुद्धी नसते, जमावाचे मानस शास्त्र जर आपण जाणले नसते तर कदाचित त्या क्षणी खरोखरच दवाखाना पेटवून दिला असता आणी डॉक्टरांना मारहाण देखील केली असती". दुपारी नागपूरला त्यांच्या कार्यालयात आलो तेंव्हा ते वैध्यकीय अधिकारी तेथेच बसले होते. फार घाबरले होते ते. डॉ. सपकाळ ह्यांनी त्यांना समजावून सांगितले, म्हणले तुम्ही निलाब्मित वगेरे काही झाला नाही आहात. तुमचा काहीच दोष नसल्यामुळे मी पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहो. १५ दिवस आराम करा, परिस्थिती निवळेल, नंतर मीच तुम्हाला त्याच केंद्रात घेवून जायील. १५ दिवसांनी त्यांनी कळमेश्वर ला पंचायत समिती सभागृहात एक सभा बोलाविली. स्थानिक लोक प्रतिनिधी आणी इतर मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर कसे बरोबर होते, त्यांचे काहीच चुकले नाही, दुर्दैवाने प्रसुतीपश्चात खूप रक्तस्त्राव झाल्यास ५-१० मिनिटात देखील मृत्यू होऊ शकतो, लोकांना समजावून सांगितले. तसेही त्या डॉक्टर बद्धल लोकांचे पूर्वमत चांगले असल्यामुळे त्यांना पुन्हा कामावर रुजू होऊ देण्यास कोणाचाच आक्षेप नव्हता. हेच डॉक्टर नंतर सेवानिवृत्त होत पर्यंत तेथेच होते आणी नंतर ही तेथेच स्थायिक झालेत.वरील प्रसंग, काय करावे, कसे वागावे, कोणत्याच व्यवस्थापनाच्या पुस्तकात ह्या बद्धल निश्चित सूचना नसतील. डॉक्टर सपकाळ ह्या प्रसंगी वागलेत ते योग्य कि अयोग्य, ह्यावर देखील चर्चा होऊ शकेल. परंतू त्या आकस्मिक स्थितीत त्यांनी दाखविलेले धैर्य, प्रसंगावधान आणी आपल्या अधिकार्याची चूक नाही तर त्याचे पाठीशी उभे राहणे, खरोखरच वाखाणण्यासारखे होते. केवळ डॉ. सपकाळ सारखी व्यक्तीच असे करू शकेल. परंतू, आकस्मिक स्थितीत लोकांच्या भावना अधिक न भडकावता, प्रसंगावधान दाखविणे कसे शक्य होते हे मात्र मी त्या प्रसंगातून शिकलो.

Saturday, March 5, 2011

सारांश - भाग 2 - The Immortals of Melhua

सोमरस, रामराज्य आणी चातुरवर्ण्य पद्धती
सोमरसाची संकल्पना आणी त्याची निर्मिती करण्याचा शोध लावणारा ब्रह्मदेव एक महान शास्त्रज्ञच. सोमरसाचा स्वतःसाठी उपयोग न करता समाजाच्या भल्यासाठी उपयोग कसा करता येईल आणी दुष्ट प्रवृत्तीचे लोक ह्याचा दुरुपयोग कसा करणार नाहीत आणी त्यावर नियंत्रण राखण्याकरिता ब्रह्मदेवाने केलेले कार्य नियोजन:
सर्व प्रदेशांमध्ये एक सखोल सर्वेक्षण करून भारताच्या सात विभागातून प्रत्येकी एक ह्या प्रमाणे अतिशय शीलवान, चारीत्र्य्पूर्ण अश्या सात तरुणांची निवड केली. स्वतःच्या गुरुकुलात समाजाच्या भल्यासाठी निरपेक्षरित्या साततत्याने कार्य करण्याची मानसिकता आणी कठोर प्रशिक्षण त्यांना दिले. Superhuman intelligence असणारे, समाजाला योग्य वर्तणुकीची दिशा दाखविणारे, कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता समाजाची सेवा करणारे, प्रत्येक प्रदेशातील एक असे हे सात ऋषी, म्हणजेच सप्तऋषी. वर्तणुकीचे अतिशय कठोर असे नियम त्यांना घालून दिले आणी नंतर त्यांनाच फक्त सोमरस प्राशन करण्याची अनुमती दिली. सप्तऋषीनी हळू हळू ब्रह्मदेवाच्या ह्या सर्व निकषानुसार नवीन नवीन तरुणांना आपल्या पंथात सामावून घेतले, त्यांना कठोर प्रशिक्षण दिले, आणी हा ब्रह्मदेवाचा पंथ किंवा ब्राह्मण म्हणून ओळखला जावू लागला. ह्या तरुणांमध्ये क्षत्रिय तथा इतर तरुण देखिल असायचे. कालांतराने, दुर्दैवाने, ह्यातील काही लोकांनी त्यांची आचारसंहिता विसरून, साधन, संपत्ती जमविण्यास सुरवात केली, सोमारसामुळे प्राप्त झालेल्या अतिरिक्त शक्तीचा दुरुपयोग करून लढाया करून आपआपली साम्राज्ये निर्माण केलीत. ब्राह्मणांमध्येसुद्धा त्यांच्या श्रेष्ठ्तेनुसार गरुड, मोर, हंस असे वर्ग होते. अहंकारामुळे स्वतःला अतिशय श्रेष्ठ् समजून त्यांनी क्षत्रिय, वैष ह्या वर्गातील श्रेष्ठ्, ज्ञानी, जबाबदार अश्या व्यक्तींची अवहेलना करण्यास सुरवात केली. ह्या सर्व प्रकारातून समाजात असहकार आणी बेबंदशाही निर्माण व्हायला लागली. शिवाय प्रत्येक समाजातील फक्त काही विशिष्ठ लोकानाच ह्याचा फायदा होत गेला आणी त्यांचीच फक्त उन्नति होत गेली. ह्या सर्व पार्श्वभूमीवर रामाने निर्माण केलेली आणी काटेकोर पणे आचरणात आणलेली चातुरवर्ण्य पद्धती कशी होती बघूया:
IIM कोलकाता येथून पदवी प्राप्त केलेल्या आमिष ह्या लेखकाने लिहिलेल्या "The Immortals of Meluha" ह्या पुस्तकातील हा सारांश. ही कोणतीही पौराणिक कथा किंवा पौराणिक कथांचे विश्लेषण नसून, वाचल्याशिवाय कळणारच नाही अशी कादंबरी.
रामाच्या असे लक्षात आले की, ह्यामुळे जातीव्यवस्था अधिकच बळकट होत आहे. ब्राह्मणांची मुले ब्राह्मण, क्षत्रियांची मुले क्षत्रिय, वैशांची मुले वैश, हीच परंपरा, ह्यात त्यांच्यातील गुणवत्तेचा, क्षमतेचा कोणताही विचार नाही. एख्याद्या ब्रह्मणाचा निर्बुद्ध मुलगाही ब्राह्मण तर एखाद्या क्षुद्राचा आतिशय हुशार, सर्व गुणवत्ता असणारा मुलगाही क्षुद्र. केवळ कर्मावर आधारित जात का नसावी हा रामाचा विचार आणी त्याने तो आमलात आणण्यास सुरवात केली. जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाचा पालक म्हणजे राजा. ह्याकरिता रामाने काय केले? नर्मदा नदीच्या किनारी सर्व सोयीनी अध्यायावत अश्या एका फार मोठ्या रुग्णालयाची निर्मिती केली. ह्या रुग्णालयाचे नाव "माहेर". कोणत्याही जातीची असोत, संपूर्ण राज्यातील कोणतीही महिला गर्भवती असताना शेवटच्या तीन महिन्यात तिने "माहेर" मध्ये दाखल झालेच पाहिजे, हा आदेश आणी त्याची काटेकोर अंमलबजावणी. ह्यात श्रीमंत/गरीब असा कोणताही भेदभाव नाही. सर्वांच्या प्रवासाची व्यवस्था. महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या जवळ कुटुंबातील कोणीही व्यक्ती असणार नाही. त्या महिलेची संपूर्ण काळजी रुग्णालयातील प्रशिक्षित कर्मचारी घेणार. प्रसुतीनंतर काही कालावधी नंतर (४-६ महिने), ती महिला एकटीच तिच्या घरी परत जाणार. येथे जन्मलेल्या मुलांना आपले आई-वडील कोण आहेत, आपली जात कोणती? किंवा येथे जन्मलेल्या मुलांपैकी आपला मुलगा किंवा मुलगी कोणती? हे कोणालाच ठाऊक नाही. ह्या सर्व मुलांच्या आरोग्याची, विकास-वाढीची जबाबदारी राजाची. थोडी मोठी झाल्यानंतर त्यांना जवळच असणारया गुरुकुलात दाखल केले जाणार. त्यामुळे ह्या मुलांमध्ये कोण ब्राम्हणाचा, क्षत्रियाचा कि क्षुद्राचा, श्रीमंताचा कि गरीबाचा कोणालाच माहित नाही. सर्वाना सारखीच वागणूक आणी सारख्याच सोयी सवलती. ह्या सर्व मुलांचे मुलभूत शिक्षण झाल्यानंतर, त्यांच्या कला गुणवत्तेचा काटेकोर अभ्यास करून, त्या क्षेत्रात पारंगत होण्यासाठी गुरुकुलात त्यांना आवश्यक सर्व प्रशिक्षण दिले जाणार. युवावस्थेत पदार्पण केल्यानंतर ह्या प्रत्येक तरुणाला सोमरस दिला जाणार. १५ वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांची परीक्षा घेतली जाणार आणी ह्या परीक्षेच्या निकालावर आधारित त्यांना ब्राम्हण, क्षत्रिय, वैष, क्षुद्र ह्या जाती व्यवस्थेत वर्गीकरण केले जाणार. नंतर पुन्हा त्यांना जाती व्यवस्थेवर आधारित विशेष प्रशिक्षण दिले जाणार आणी त्यांना त्यांच्या वर्ण व्यवस्थेची ओळख म्हणून एक उपर्ण दिले जाणार. ब्राम्हनासाठी पांढरे, लाल क्षत्रीयासाठी, हिरवे वैशाकरिता आणी काळे क्षुद्राकरिता. रामाच्या दृष्टीकोनातून वर्ण म्हणजे रंग, जात नव्हे. पालकांनी नंतर मुलांसाठी अर्ज करायचा. ब्राह्मण पालकांना संपूर्ण ब्राह्मण वर्णातील एक मुलगा randomly दिला जाणार, त्याच प्रमाणे क्षत्रिय पालकाला क्षत्रिय वर्णातील एक मुलगा. हा मुलगा नंतर त्यांच्या पालकांकडे त्यांच्या मुलासारखाच वाढणार आणी त्याला सर्व मुलाचेच हक्क मिळणार. ह्या व्यवस्थेमुळे एखाद्या क्षुद्र मातेचा मुलगा त्याला सर्व सामान संधी उपलब्ध झाल्यामुळे आणी तो खूप हुशार असल्यास तरुणपणी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा वर्ण ब्राम्हण म्हणून निश्चित होणार आणी कोणी तरी ब्राम्हण पालक त्याचे पालकत्व स्वीकारणार. तसेच एखाद्या ब्राह्मण मातेच्या मुलाचे पालकत्व त्या मुलाला शिक्षणानंतर काळा वर्ण मिळाल्यास त्याचे पालकत्व एखादा शुद्र स्वीकारणार. आणी रामाने ही व्यवस्था इतक्या काटेकोरपणे आमलात आणली कि सर्व प्रजाही रामावर खुश होती.
अतिशय अनाकलनीय, बुद्धीला पटणार नाही, तरी देखील विचार करायला लावणारे एक वेगळेच लिखाण लेखकाने ह्या पुस्तकात केलेले आहे.