Showing posts with label Is this a life?. Show all posts
Showing posts with label Is this a life?. Show all posts

Thursday, April 7, 2011

दमलेल्या बाबाची.......

३ मुले आणी आई वडील असे हे कुटूंब. परिस्थिती अतिशय मध्यमवर्गीय. वडील एका कंपनीत लेखापाल ह्या पदावर. कुटुंबाचा खर्च जेमतेम भागेल एव्हडेच मासिक उत्पन्न. आपले मासिक उत्पन्न वाढविण्याकरिता आणी पदोन्नतीसाठी किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे ह्याची वडिलाना जाणीव. दिवसभर काम करून संध्याकाळच्या कॉलेज मध्ये जाऊन, घरी वापस आल्यानंतर पुन्हा अभ्यास. ध्येय एकाच,आपल्या मुलांना चांगल्यात चांगल्या परीस्तीतीत ठेवण्यासाठी कोणतीही मेहनत करण्याची तयारी. ह्या सर्व ओढाताणीत, मुलांशी खेळण्यासाठी, बोलण्यासाठी, एकत्रित जेवण्यासाठी, पत्नीशी देखील बोलण्यासाठी वेळच नाही. आपले उज्वल भविष्य आणी त्याकरिता करावी लागणारी मेहनत, एव्हडेच विचार सतत डोक्यात. मेहनत करून पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्यानंतर पदोन्नती आणी पगारवाढ. घरची आर्थिक परिस्थिती थोडी सुधारलेली. तरी देखील अधिक सुधारण्याकरिता पुन्हा पदव्युत्तर परीक्षेची तयारी आणी सतत काम. नंतर अधिकारी ह्या पदावर पदोन्नती, पुन्हा पगारवाढ. दोन खोल्यांच्या घरातून ३ खोल्यांच्या घरात स्थानांतर. मुलांचे उत्तम भावित्तव्य घडविण्यासाठी, घरातील सर्वाना उत्तमात उत्तम सुविधा प्राप्त होण्यासाठी पुन्हा उच्च शिक्षण, पुन्हा कंपनीत फार मोठ्या पदावर पदोन्नती. सतत मेहनत आणी कामात व्यग्र ह्यामुळे ८-८ दिवस मुलांशी, पत्नीशी बोलणे देखील होत नव्हते. मुलांची आणी पत्नीची, बाबाशी/पतीशी बोलणेच होत नाही ही सततची तक्रार आणी ठराविक उत्तर, "मी ही सर्व मेहनत कोणासाठी करीत आहो?". आर्थिक परिस्थितीत अधिक सुधारणा झाल्यानंतर, स्वतः चा ५ खोल्यांचा ब्लॉक, पत्नीला कामात त्रास होऊ नये म्हणून दोन घरगड्यांची नियुक्ती, मुलांना उत्तमात उत्तम कॉलेज मध्ये दाखला, त्यांना कॉलेज मध्ये जाण्यासाठी कार आणी वाहनचालक.

नंतर कंपनीच्या सर्वात जेष्ठ पदावर पदोन्नती. समुद्रकिनारी, मुलांसाठी, पत्नी साठी नवीन बंगल्याची खरेदी. जेवढे मोठे पद तेव्हडीच कामाची जास्त व्यग्रता, सततचे दौरे, प्रवास आणी आपण सुरवातीला जे काही ठरविले होते ते सर्व आपल्या मुलांना मिळत आहे हे बघून धन्न्यता. परंतु वडील मात्र आपल्या पासून फार दुरावलेले आहेत, त्यांना आपणासाठी काहीच वेळ नाही ही मुलांची सततची तक्रार, पत्नीचीही हीच तक्रार. परिवारात एकत्रित संवादाचा संपूर्ण अभाव.

वडील, वय वर्षे ५५, संध्याकाळी चुकून लवकर घरी आले. मुले बाहेर गेलेली, पत्नी देखील मैत्रिणीसोबत बाहेर गेलेली. बंगल्यातील बाल्कनीत बसून चहा पीत समुद्र किनार्याचे अवलोकन. निसर्ग इतका सुंदर आहे ह्याची प्रथमच जाणीव झालेली. मनात अनेक विचार आणी आयुष्याचा संपूर्ण चित्रपट डोळ्यापुढे. आयुष्याच्या ह्या कुतरओढीत सर्व ऐहिक सुख प्राप्त केले, पण खऱ्या अर्थाने जीवन मात्र जगावयाचे राहूनच गेले. मुले, पत्नी दुरावलेली, काय मिळविले आयुष्याच्या ह्या संध्याकाळी. डोळ्यात दोन अश्रू आलेत आणी निर्धार केला. बस झाली ही धावाधाव, उद्यापासून प्रत्येक क्षण मुलांसाठी, पत्नीसाठी जगायचा. रात्री मुले, पत्नी घरी आलीत. अनेक वर्षानंतर सर्वांनी एकत्र जेवण केले, खूप गप्पा मारल्यात आणी वडिलांनी आपली चूक काबुल केली. सर्वाना हा एक सुखद धक्काच होता. वडिलांनी जाहीर केले, उद्यापासून सकाळी आपण सर्व समुद्रकिनारी फिरायला जावू , रोज संध्याकाळी मी लवकर घरी येईन, एकत्रित सर्वांनी जेवण करायचे, खूप गप्पा मारायच्या, शनिवार, रविवार संपूर्ण कुटुंबासाठी, आता ह्यापुढील सर्व आयुष्य फक्त आणी फक्त कुटुंबासाठीच. घरात प्रथमच अतिशय आनंदी वातावरण, आणी ह्याच आनंदी वातावरणात सर्व झोपायला गेलेत.

सकाळी ५.३० वाजता फिरायला जाण्यासठी मुलाने वडिलांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला, दरवाजा उघडाच होता, वडील पलंगावर झोपलेले होते, वडिलांना उठविण्याचा मुलाने प्रयत्न केला, पण रात्रीच वडिलांची प्राणज्योत मालविलेली होती. वडिलांसाठी, कुटुंबासाठी ही सुंदर सकाळ झालेलीच नव्हती.

बहुदा अनेकांनी वाचलेली किंवा ऐकलेली ही कथा, परंतू जीवनात कोणत्या वेळी कशाला प्राधान्य द्यावे, बरेच काही आपणाला अंतर्मुख होवून विचार करावयास लावणारी.