Saturday, April 23, 2011

आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे


" आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे" मराठीतील एक अतिशय चाकोरीबाहेर विचार करणारे कवी, संगीतकार, गायक श्री. अवधूत गुप्ते ह्यांचे हे एक प्रसिद्ध गीत. ह्या गीताचे लेखक अवधूत नसून दुसरे कोणी असल्यास मी त्यांची माफी मागतो. कारण अवधूत गुप्तेचेच म्हणून हे गाणे प्रसिद्ध आहे. "सनई चौघडे " ह्या मराठी चित्रपटातील हे गीत. "आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे" ह्या संपूर्ण गीतातील ह्या चार शब्दांचा अर्थ काय असावा ह्याचा अनेक दिवसांपासून विचार करतोय. संपूर्ण गीत ऐकल्यानंतरही ह्या चार शब्दांचा काय अर्थ असेल, केवळ सुंदर चाल, सुंदर आवाजातील गीत आणी गायक अवधूत गुप्ते म्हणून तर हे गीत इतके लोकप्रिय झालेले नसेल ना? अर्थ मात्र मनाशी तदात्य्म होण्यासारखा सापडतच नव्हता. आणी, आज पुन्हा मनाशीच हे गीत गुणगुणताना ह्या चार शब्दांचा मला समजलेला अर्थ:

" आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे" , कांदेपोहे खाताना आणी ते आपणाला आवडणारे असे झाले असतील तर त्याची चव काही काळतरी आपल्या जिभेवर रेंगाळत असते आणी त्या कालवधीत त्या कान्देपोह्याची आपण पुन्हा पुन्हा आठवण काढून आनंदी, सुखी होतो, हा आनंद आणी हे सुख आपण इतरांशी देखील भरभरून share करतो. अश्याच प्रकारे आपणाला जाणवणारे सुखाचे क्षण आपल्या आयुष्यात येत राहतात, पुढील आयुष्य जगण्याची एक नवी उमेद आपणाला देत राहतात आणी एक सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आपण आपले आयुष्य जगत असतो. किंबहुना असलेच क्षण/प्रसंग जीवन जगण्यासाठी संजीवनी ठरत असतात. कांदेपोहे आणी आयुष्य, म्हणजेच जीवनात येणारे छोटे छोटे सुखाचे क्षण आणी त्यात मिळणारा आनंद, हा कदाचित ह्या चार शब्दातून मिळणारा संदेश असावा.

परंतु, कांदेपोहे, त्याची चव, खाताना मिळणारा आनंद आणी नंतर काही कालावधीपर्यंत रेंगाळत राहणारी चव, चांगल्या आठवणी, ह्या फक्त सकृतदर्शनी नाहीत काय? ह्या उत्कृष्ठ कांदेपोह्यांची पार्श्वभूमी आपण कधी जाणून त्याचे विश्लेषण करण्याचा करण्याचा प्रयत्न करतो काय? कांदेपोहे म्हणजे आयुष्यातील एक अविस्मरणीय चांगला क्षण. पण, हा चांगला क्षण कश्यामुळे निर्माण होऊ शकला, त्यासाठी कोणी कोणी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष प्रयास केलेत हे मात्र आपण सोयीस्करपणे विसरून जातो. " आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे" ह्या ओळीतील चूल आणी कढई, आयुष्यातील ह्या दोन शब्दांचा आपण कधी विचार केलाय काय? कांदेपोहे म्हणजे आयुष्यातील एक चांगला, आठवणीत राहणारा क्षण, पण, हा क्षण अविस्मरणीय होण्यासाठी चूल आणी कढई तेवढीच महत्वाची नाही काय? कदाचित कांदेपोहे करणारी व्यक्ती फार सुगरण असलेही, पण जेवढे कांदेपोहे करावयाचे आहे हे ध्यानात ठेवून त्यासाठी नेमकी आवश्यक आकाराची कढई नसल्यास,व्यवस्थित परतून हे कांदेपोहे चांगले झाले असते काय? आणी " चूल"?, कांदेपोहे करणारी व्यक्ती सुगरण, कढई देखील योग्य आकाराची, मग चुलीचे काय महत्व? कांदेपोहे स्वादिष्ठ होण्यासाठी, त्याला योग्य प्रमाणात आच उष्णता मिळण्यासाठी, ते योग्य प्रमाणात शिजण्यासाठी, " चूल" देखील तेवढीच महत्वाची नाही काय?, आणी ही उष्णता निर्माण करताना जाळून राख होणारी ती लाकड?

म्हणजेच काय तर कांदेपोहे हा जीवनातील एक अविस्मरणीय चांगला क्षण असेल तर, फक्त कान्देपोह्याची उत्कृष्ठ चव किंवा ते करणारी सुगरण व्यक्ती, फक्त ह्याचा विचार न करता, ह्या अविस्मरणीय चांगल्या क्षणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या, परंतू सकृतदर्शनी न जाणवणाऱ्या बाबींचा देखील आपण विचार केल्यास आयुष्यातील हा एक अविस्मरणीय चांगला क्षण अधिक काळ पर्यंत आपणाला आठवत राहील आणी विचारांची, वर्तणुकीची एक वेगळीच दिशा आपणास देत राहील आणी खऱ्या अर्थाने आपणाला "चूल" आणी "कढई" ह्या दोन शब्दांचा अर्थ आणी त्याचे महत्व कळेल. आणी सर्वात महत्वाचे म्हणजे, ह्या सुंदर क्षणासाठी कोठेही उल्लेख न झालेली, राख झालेली ती लाकड?, स्वतः जाळून नाहीशी झालेली ती लाकड आणी त्यांचा त्याग, ह्याचाही विचार केल्यास " आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे" ह्या चार शब्दांचे, आयुष्याच्या आठवणीतील चांगल्या क्षणाचे महत्व बरेच काल पर्यंत आपल्या स्मरणात राहील.

Thursday, April 7, 2011

दमलेल्या बाबाची.......

३ मुले आणी आई वडील असे हे कुटूंब. परिस्थिती अतिशय मध्यमवर्गीय. वडील एका कंपनीत लेखापाल ह्या पदावर. कुटुंबाचा खर्च जेमतेम भागेल एव्हडेच मासिक उत्पन्न. आपले मासिक उत्पन्न वाढविण्याकरिता आणी पदोन्नतीसाठी किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे ह्याची वडिलाना जाणीव. दिवसभर काम करून संध्याकाळच्या कॉलेज मध्ये जाऊन, घरी वापस आल्यानंतर पुन्हा अभ्यास. ध्येय एकाच,आपल्या मुलांना चांगल्यात चांगल्या परीस्तीतीत ठेवण्यासाठी कोणतीही मेहनत करण्याची तयारी. ह्या सर्व ओढाताणीत, मुलांशी खेळण्यासाठी, बोलण्यासाठी, एकत्रित जेवण्यासाठी, पत्नीशी देखील बोलण्यासाठी वेळच नाही. आपले उज्वल भविष्य आणी त्याकरिता करावी लागणारी मेहनत, एव्हडेच विचार सतत डोक्यात. मेहनत करून पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्यानंतर पदोन्नती आणी पगारवाढ. घरची आर्थिक परिस्थिती थोडी सुधारलेली. तरी देखील अधिक सुधारण्याकरिता पुन्हा पदव्युत्तर परीक्षेची तयारी आणी सतत काम. नंतर अधिकारी ह्या पदावर पदोन्नती, पुन्हा पगारवाढ. दोन खोल्यांच्या घरातून ३ खोल्यांच्या घरात स्थानांतर. मुलांचे उत्तम भावित्तव्य घडविण्यासाठी, घरातील सर्वाना उत्तमात उत्तम सुविधा प्राप्त होण्यासाठी पुन्हा उच्च शिक्षण, पुन्हा कंपनीत फार मोठ्या पदावर पदोन्नती. सतत मेहनत आणी कामात व्यग्र ह्यामुळे ८-८ दिवस मुलांशी, पत्नीशी बोलणे देखील होत नव्हते. मुलांची आणी पत्नीची, बाबाशी/पतीशी बोलणेच होत नाही ही सततची तक्रार आणी ठराविक उत्तर, "मी ही सर्व मेहनत कोणासाठी करीत आहो?". आर्थिक परिस्थितीत अधिक सुधारणा झाल्यानंतर, स्वतः चा ५ खोल्यांचा ब्लॉक, पत्नीला कामात त्रास होऊ नये म्हणून दोन घरगड्यांची नियुक्ती, मुलांना उत्तमात उत्तम कॉलेज मध्ये दाखला, त्यांना कॉलेज मध्ये जाण्यासाठी कार आणी वाहनचालक.

नंतर कंपनीच्या सर्वात जेष्ठ पदावर पदोन्नती. समुद्रकिनारी, मुलांसाठी, पत्नी साठी नवीन बंगल्याची खरेदी. जेवढे मोठे पद तेव्हडीच कामाची जास्त व्यग्रता, सततचे दौरे, प्रवास आणी आपण सुरवातीला जे काही ठरविले होते ते सर्व आपल्या मुलांना मिळत आहे हे बघून धन्न्यता. परंतु वडील मात्र आपल्या पासून फार दुरावलेले आहेत, त्यांना आपणासाठी काहीच वेळ नाही ही मुलांची सततची तक्रार, पत्नीचीही हीच तक्रार. परिवारात एकत्रित संवादाचा संपूर्ण अभाव.

वडील, वय वर्षे ५५, संध्याकाळी चुकून लवकर घरी आले. मुले बाहेर गेलेली, पत्नी देखील मैत्रिणीसोबत बाहेर गेलेली. बंगल्यातील बाल्कनीत बसून चहा पीत समुद्र किनार्याचे अवलोकन. निसर्ग इतका सुंदर आहे ह्याची प्रथमच जाणीव झालेली. मनात अनेक विचार आणी आयुष्याचा संपूर्ण चित्रपट डोळ्यापुढे. आयुष्याच्या ह्या कुतरओढीत सर्व ऐहिक सुख प्राप्त केले, पण खऱ्या अर्थाने जीवन मात्र जगावयाचे राहूनच गेले. मुले, पत्नी दुरावलेली, काय मिळविले आयुष्याच्या ह्या संध्याकाळी. डोळ्यात दोन अश्रू आलेत आणी निर्धार केला. बस झाली ही धावाधाव, उद्यापासून प्रत्येक क्षण मुलांसाठी, पत्नीसाठी जगायचा. रात्री मुले, पत्नी घरी आलीत. अनेक वर्षानंतर सर्वांनी एकत्र जेवण केले, खूप गप्पा मारल्यात आणी वडिलांनी आपली चूक काबुल केली. सर्वाना हा एक सुखद धक्काच होता. वडिलांनी जाहीर केले, उद्यापासून सकाळी आपण सर्व समुद्रकिनारी फिरायला जावू , रोज संध्याकाळी मी लवकर घरी येईन, एकत्रित सर्वांनी जेवण करायचे, खूप गप्पा मारायच्या, शनिवार, रविवार संपूर्ण कुटुंबासाठी, आता ह्यापुढील सर्व आयुष्य फक्त आणी फक्त कुटुंबासाठीच. घरात प्रथमच अतिशय आनंदी वातावरण, आणी ह्याच आनंदी वातावरणात सर्व झोपायला गेलेत.

सकाळी ५.३० वाजता फिरायला जाण्यासठी मुलाने वडिलांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला, दरवाजा उघडाच होता, वडील पलंगावर झोपलेले होते, वडिलांना उठविण्याचा मुलाने प्रयत्न केला, पण रात्रीच वडिलांची प्राणज्योत मालविलेली होती. वडिलांसाठी, कुटुंबासाठी ही सुंदर सकाळ झालेलीच नव्हती.

बहुदा अनेकांनी वाचलेली किंवा ऐकलेली ही कथा, परंतू जीवनात कोणत्या वेळी कशाला प्राधान्य द्यावे, बरेच काही आपणाला अंतर्मुख होवून विचार करावयास लावणारी.

Tuesday, March 29, 2011

प्रसंगावधान


१९७९ मध्ये मी नागपूर जिल्ह्यातील कचारीसावंगा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी ह्या पदावर कार्यरत होतो. डॉ. सपकाळ आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी. एक वादग्रस्त व्यक्तिमत्व, पण खऱ्या अर्थाने व्यवस्थापन कौशल्य शिकावयाचे झाल्यास त्यांचे कडून शिकावे असे डॉ. सपकाळ. वेळप्रसंगी प्रशासनातील कायदे, नियम बाजूला सारून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सतत मदत करणारे. त्यांचे दौरे मात्र संध्याकाळचे. संध्याकाळी ४-५ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रात २-३ मित्रांसोबत येणार, कामाची तपासणी, चर्चा केल्यानंतर मुक्काम करणार आणी दुसऱ्या दिवशी सकाळी नागपूरला परत जाणार. एकदा असेच सकाळी नागपूरला परत जाताना मलाही काही काम असल्यामुळे त्यांचेसोबत जाण्याची त्यांना विनंती केली आणी त्यांचेसोबत नागपूरला निघालो. त्याकाळी जिल्हा आरोग्य अधिकार्याची पांढरी raunold कार सर्वाना माहित असावयाची. कारण इतर सर्व जिल्हा स्थरावरील अधिकाऱ्यांच्या वाहनापेक्षा ही कार एक वेगळीच होती. काटोल मार्गे आम्ही नागपूर ला जाण्यास निघालो. रस्त्यात कळमेश्वर हे प्राथमिक आरोग्य केन्द्र आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात आणी रस्त्यावर २००-३०० माणसांची गर्दी. जिल्हा आरोग्य अधिकार्याची पांढरी कार बघून लोकांनी वाहन अडविले. स्थानिक वैध्यकीय अधिकार्याच्या विरोधात नारेबाजी सुरु केली. ही सर्व परिस्थिती का घडली त्याची पार्श्वभूमी:रात्री गावातील एक महिला प्रसुतीकारिता रुग्णालयात दाखल झाली. सकाळी तिची प्रसूती झाली आणी प्रसुतीनंतर तिला खूप रक्तस्त्राव सुरु झाला. वैध्यकीय अधिकार्यांनी तपासून काही जुजबी उपचार सुरु केलेत आणी अर्ध्या तासानंतर रक्तस्त्राव खूप प्रमाणात सुरूच असल्यामुळे आणी रुग्णाची सर्वसाधारण स्थिती गंभीर होत असल्यामुळे रुग्णांच्या नातेवायीकाना तिला तत्काळ नागपूर येथील वैध्यकीय महाविध्यालयात पुढील उपचारासाठी घेऊन जाण्याच्या सल्ला दिला. दुर्दैवाने त्यापूर्वीच रुग्णाचा मृत्त्यू झाला. थोड्याच वेळात १०-१२ लोक जमा झालेत. जनसमुदायाची नेहमीच आढळणारी मानसिकता. कोणत्याही परिस्थितीची शहानिशा न करता, डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे ही स्त्री दगावली, ही चुकीची बातमी वार्यासारखी गावात पसरली. १५-20 मिनीटातच १५०-२०० लोक गोळा झालेत. डॉक्टरच दोषी, मारा त्यांना, जाळून टाका हे केन्द्र, ही चर्चा आणी समुदायाची मानसिकता अधिकच भडकत गेली. डॉक्टरांनी घाबरून स्वतःला एक खोलीत कोंडून घेतले. दवाखान्यावर दगडे मारून काचा फोडल्या गेल्यात. आणी तेव्हाच आम्ही तेथे पोहचलो होतो. डॉ. सपकाळ हे जमावाच्या मध्यभागी गेलेत. कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जमाव साहजिकच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तेवढ्यात २-३ लोकांनी रॉकेल च्या डबक्या देखील आणल्यात. बस.. जला दो, जला दो च्या घोषणा ऐकत येत होत्या. तेवढ्यात २-४ लोकांनी नारेबाजी सुरु केली, हे अधिकारी आता त्यांच्याच अधिकार्याला पाठीशी घालणार. "उनकी गाडी भी जला दो" जोर जोऱ्यात घोषणा सुरु झाल्यात. तेवढ्यात पोलीस ची गाडी ४-५ पोलिसांसह दवाखान्याच्या आवारात शिरताना दिसली. पोलिसांना बघून लोकांना अधिकच उधान आले, घोषणाबाजी सुरूच होती. आणी मग डॉ. सपकाळ ही काय चीज आहे ह्याची चुणूक दिसली. सर्वप्रथम त्यांनी पोलीस आणी त्यांची गाडी दवाखान्याच्या आवाराच्या बाहेर नेण्याचे आदेश दिलेत. एका माणसाच्या हातून रॉकेल चा डबा हिसकला, आणी कोणाच्याही लक्षात येण्यापुर्वीच स्वतःच्या गाडीवर आणी दवाखान्याच्या बाहेरील भिंतीवर डब्यातील रॉकेल भिरकविण्यास सुरवात केली. आणी आपल्या वाहन चालकास म्हणले " आन रे काडी पेटी, मीच प्रथम आग लावतो. लोकांना कळलेच नाही काय होतंय ते, क्षणात नारेबाजी थांबली. मग त्यांनी बोलण्यास सुरवात केली. त्या दुर्दैवी स्त्रीच्या मृत्यूस जर डॉक्टर जबाबदार असतील तर ह्या रुग्णालयाला मीच आग लावतो, तुम्ही कशाला तसदी घेता. नंतर, पोलीस इन्स्पेक्टर ला बोलावले, आतून डॉक्टर ला बाहेर काढले, पोलिसांना आदेश दिलेत, ह्या डॉक्टर विरुद्ध गुन्हा नोंदवून तत्काळ ह्यांना नागपूर ला पोलीस मुख्यालयी घेवून या. मला म्हणले, "देवा, १ तासात संपूर्ण निपक्षपाती चौकशी कर, कर्मचाऱ्यांचे, नातेवायीकांचे statements घे, आणी सर्व अहवाल तयार कर, तो पर्यंत मी येथेच थांबतो. लगेच नागपूर ला फोन करून वरिष्ठ अधिकार्याशी बोललेत. जमावाच्या मध्य भागी खुर्ची टाकून बसलेत आणी तेथेच स्थानिक लिपिकास डॉक्टरांचे निलंबनाचे आदेश टाईप करून आणण्याची सूचना दिली. स्वतःला अधिकार नसताना देखील ह्या आदेशावर स्वाक्षरी केली. सोबतच जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत येत आहे हे बघून त्यांचेही प्रभोदन करण्यास सुरवात केली. जमाव हळू हळू शांत झाला आणी ३० मिनीटातच जमावाची पांगापांग झाली. कधीही कल्पना देखील करू शकणार नाही असा हा मला आलेला अनुभव.२ तासानंतर आम्ही नागपूरला जाण्यास निघालो. मी म्हणलो, "सर, चौकशी अंती मला तरी डॉक्टर चा काहीच दोष दिसत नाही. उगाच आपण त्यांना निलंबनाची शिक्षा दिली आणी पोलिसांच्या गाडीत नागपूरला पाठविले" सर म्हणले, "जमावाला विवेकबुद्धी नसते, जमावाचे मानस शास्त्र जर आपण जाणले नसते तर कदाचित त्या क्षणी खरोखरच दवाखाना पेटवून दिला असता आणी डॉक्टरांना मारहाण देखील केली असती". दुपारी नागपूरला त्यांच्या कार्यालयात आलो तेंव्हा ते वैध्यकीय अधिकारी तेथेच बसले होते. फार घाबरले होते ते. डॉ. सपकाळ ह्यांनी त्यांना समजावून सांगितले, म्हणले तुम्ही निलाब्मित वगेरे काही झाला नाही आहात. तुमचा काहीच दोष नसल्यामुळे मी पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहो. १५ दिवस आराम करा, परिस्थिती निवळेल, नंतर मीच तुम्हाला त्याच केंद्रात घेवून जायील. १५ दिवसांनी त्यांनी कळमेश्वर ला पंचायत समिती सभागृहात एक सभा बोलाविली. स्थानिक लोक प्रतिनिधी आणी इतर मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर कसे बरोबर होते, त्यांचे काहीच चुकले नाही, दुर्दैवाने प्रसुतीपश्चात खूप रक्तस्त्राव झाल्यास ५-१० मिनिटात देखील मृत्यू होऊ शकतो, लोकांना समजावून सांगितले. तसेही त्या डॉक्टर बद्धल लोकांचे पूर्वमत चांगले असल्यामुळे त्यांना पुन्हा कामावर रुजू होऊ देण्यास कोणाचाच आक्षेप नव्हता. हेच डॉक्टर नंतर सेवानिवृत्त होत पर्यंत तेथेच होते आणी नंतर ही तेथेच स्थायिक झालेत.वरील प्रसंग, काय करावे, कसे वागावे, कोणत्याच व्यवस्थापनाच्या पुस्तकात ह्या बद्धल निश्चित सूचना नसतील. डॉक्टर सपकाळ ह्या प्रसंगी वागलेत ते योग्य कि अयोग्य, ह्यावर देखील चर्चा होऊ शकेल. परंतू त्या आकस्मिक स्थितीत त्यांनी दाखविलेले धैर्य, प्रसंगावधान आणी आपल्या अधिकार्याची चूक नाही तर त्याचे पाठीशी उभे राहणे, खरोखरच वाखाणण्यासारखे होते. केवळ डॉ. सपकाळ सारखी व्यक्तीच असे करू शकेल. परंतू, आकस्मिक स्थितीत लोकांच्या भावना अधिक न भडकावता, प्रसंगावधान दाखविणे कसे शक्य होते हे मात्र मी त्या प्रसंगातून शिकलो.

Saturday, March 5, 2011

सारांश - भाग 2 - The Immortals of Melhua

सोमरस, रामराज्य आणी चातुरवर्ण्य पद्धती
सोमरसाची संकल्पना आणी त्याची निर्मिती करण्याचा शोध लावणारा ब्रह्मदेव एक महान शास्त्रज्ञच. सोमरसाचा स्वतःसाठी उपयोग न करता समाजाच्या भल्यासाठी उपयोग कसा करता येईल आणी दुष्ट प्रवृत्तीचे लोक ह्याचा दुरुपयोग कसा करणार नाहीत आणी त्यावर नियंत्रण राखण्याकरिता ब्रह्मदेवाने केलेले कार्य नियोजन:
सर्व प्रदेशांमध्ये एक सखोल सर्वेक्षण करून भारताच्या सात विभागातून प्रत्येकी एक ह्या प्रमाणे अतिशय शीलवान, चारीत्र्य्पूर्ण अश्या सात तरुणांची निवड केली. स्वतःच्या गुरुकुलात समाजाच्या भल्यासाठी निरपेक्षरित्या साततत्याने कार्य करण्याची मानसिकता आणी कठोर प्रशिक्षण त्यांना दिले. Superhuman intelligence असणारे, समाजाला योग्य वर्तणुकीची दिशा दाखविणारे, कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता समाजाची सेवा करणारे, प्रत्येक प्रदेशातील एक असे हे सात ऋषी, म्हणजेच सप्तऋषी. वर्तणुकीचे अतिशय कठोर असे नियम त्यांना घालून दिले आणी नंतर त्यांनाच फक्त सोमरस प्राशन करण्याची अनुमती दिली. सप्तऋषीनी हळू हळू ब्रह्मदेवाच्या ह्या सर्व निकषानुसार नवीन नवीन तरुणांना आपल्या पंथात सामावून घेतले, त्यांना कठोर प्रशिक्षण दिले, आणी हा ब्रह्मदेवाचा पंथ किंवा ब्राह्मण म्हणून ओळखला जावू लागला. ह्या तरुणांमध्ये क्षत्रिय तथा इतर तरुण देखिल असायचे. कालांतराने, दुर्दैवाने, ह्यातील काही लोकांनी त्यांची आचारसंहिता विसरून, साधन, संपत्ती जमविण्यास सुरवात केली, सोमारसामुळे प्राप्त झालेल्या अतिरिक्त शक्तीचा दुरुपयोग करून लढाया करून आपआपली साम्राज्ये निर्माण केलीत. ब्राह्मणांमध्येसुद्धा त्यांच्या श्रेष्ठ्तेनुसार गरुड, मोर, हंस असे वर्ग होते. अहंकारामुळे स्वतःला अतिशय श्रेष्ठ् समजून त्यांनी क्षत्रिय, वैष ह्या वर्गातील श्रेष्ठ्, ज्ञानी, जबाबदार अश्या व्यक्तींची अवहेलना करण्यास सुरवात केली. ह्या सर्व प्रकारातून समाजात असहकार आणी बेबंदशाही निर्माण व्हायला लागली. शिवाय प्रत्येक समाजातील फक्त काही विशिष्ठ लोकानाच ह्याचा फायदा होत गेला आणी त्यांचीच फक्त उन्नति होत गेली. ह्या सर्व पार्श्वभूमीवर रामाने निर्माण केलेली आणी काटेकोर पणे आचरणात आणलेली चातुरवर्ण्य पद्धती कशी होती बघूया:
IIM कोलकाता येथून पदवी प्राप्त केलेल्या आमिष ह्या लेखकाने लिहिलेल्या "The Immortals of Meluha" ह्या पुस्तकातील हा सारांश. ही कोणतीही पौराणिक कथा किंवा पौराणिक कथांचे विश्लेषण नसून, वाचल्याशिवाय कळणारच नाही अशी कादंबरी.
रामाच्या असे लक्षात आले की, ह्यामुळे जातीव्यवस्था अधिकच बळकट होत आहे. ब्राह्मणांची मुले ब्राह्मण, क्षत्रियांची मुले क्षत्रिय, वैशांची मुले वैश, हीच परंपरा, ह्यात त्यांच्यातील गुणवत्तेचा, क्षमतेचा कोणताही विचार नाही. एख्याद्या ब्रह्मणाचा निर्बुद्ध मुलगाही ब्राह्मण तर एखाद्या क्षुद्राचा आतिशय हुशार, सर्व गुणवत्ता असणारा मुलगाही क्षुद्र. केवळ कर्मावर आधारित जात का नसावी हा रामाचा विचार आणी त्याने तो आमलात आणण्यास सुरवात केली. जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाचा पालक म्हणजे राजा. ह्याकरिता रामाने काय केले? नर्मदा नदीच्या किनारी सर्व सोयीनी अध्यायावत अश्या एका फार मोठ्या रुग्णालयाची निर्मिती केली. ह्या रुग्णालयाचे नाव "माहेर". कोणत्याही जातीची असोत, संपूर्ण राज्यातील कोणतीही महिला गर्भवती असताना शेवटच्या तीन महिन्यात तिने "माहेर" मध्ये दाखल झालेच पाहिजे, हा आदेश आणी त्याची काटेकोर अंमलबजावणी. ह्यात श्रीमंत/गरीब असा कोणताही भेदभाव नाही. सर्वांच्या प्रवासाची व्यवस्था. महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या जवळ कुटुंबातील कोणीही व्यक्ती असणार नाही. त्या महिलेची संपूर्ण काळजी रुग्णालयातील प्रशिक्षित कर्मचारी घेणार. प्रसुतीनंतर काही कालावधी नंतर (४-६ महिने), ती महिला एकटीच तिच्या घरी परत जाणार. येथे जन्मलेल्या मुलांना आपले आई-वडील कोण आहेत, आपली जात कोणती? किंवा येथे जन्मलेल्या मुलांपैकी आपला मुलगा किंवा मुलगी कोणती? हे कोणालाच ठाऊक नाही. ह्या सर्व मुलांच्या आरोग्याची, विकास-वाढीची जबाबदारी राजाची. थोडी मोठी झाल्यानंतर त्यांना जवळच असणारया गुरुकुलात दाखल केले जाणार. त्यामुळे ह्या मुलांमध्ये कोण ब्राम्हणाचा, क्षत्रियाचा कि क्षुद्राचा, श्रीमंताचा कि गरीबाचा कोणालाच माहित नाही. सर्वाना सारखीच वागणूक आणी सारख्याच सोयी सवलती. ह्या सर्व मुलांचे मुलभूत शिक्षण झाल्यानंतर, त्यांच्या कला गुणवत्तेचा काटेकोर अभ्यास करून, त्या क्षेत्रात पारंगत होण्यासाठी गुरुकुलात त्यांना आवश्यक सर्व प्रशिक्षण दिले जाणार. युवावस्थेत पदार्पण केल्यानंतर ह्या प्रत्येक तरुणाला सोमरस दिला जाणार. १५ वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांची परीक्षा घेतली जाणार आणी ह्या परीक्षेच्या निकालावर आधारित त्यांना ब्राम्हण, क्षत्रिय, वैष, क्षुद्र ह्या जाती व्यवस्थेत वर्गीकरण केले जाणार. नंतर पुन्हा त्यांना जाती व्यवस्थेवर आधारित विशेष प्रशिक्षण दिले जाणार आणी त्यांना त्यांच्या वर्ण व्यवस्थेची ओळख म्हणून एक उपर्ण दिले जाणार. ब्राम्हनासाठी पांढरे, लाल क्षत्रीयासाठी, हिरवे वैशाकरिता आणी काळे क्षुद्राकरिता. रामाच्या दृष्टीकोनातून वर्ण म्हणजे रंग, जात नव्हे. पालकांनी नंतर मुलांसाठी अर्ज करायचा. ब्राह्मण पालकांना संपूर्ण ब्राह्मण वर्णातील एक मुलगा randomly दिला जाणार, त्याच प्रमाणे क्षत्रिय पालकाला क्षत्रिय वर्णातील एक मुलगा. हा मुलगा नंतर त्यांच्या पालकांकडे त्यांच्या मुलासारखाच वाढणार आणी त्याला सर्व मुलाचेच हक्क मिळणार. ह्या व्यवस्थेमुळे एखाद्या क्षुद्र मातेचा मुलगा त्याला सर्व सामान संधी उपलब्ध झाल्यामुळे आणी तो खूप हुशार असल्यास तरुणपणी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा वर्ण ब्राम्हण म्हणून निश्चित होणार आणी कोणी तरी ब्राम्हण पालक त्याचे पालकत्व स्वीकारणार. तसेच एखाद्या ब्राह्मण मातेच्या मुलाचे पालकत्व त्या मुलाला शिक्षणानंतर काळा वर्ण मिळाल्यास त्याचे पालकत्व एखादा शुद्र स्वीकारणार. आणी रामाने ही व्यवस्था इतक्या काटेकोरपणे आमलात आणली कि सर्व प्रजाही रामावर खुश होती.
अतिशय अनाकलनीय, बुद्धीला पटणार नाही, तरी देखील विचार करायला लावणारे एक वेगळेच लिखाण लेखकाने ह्या पुस्तकात केलेले आहे.

Sunday, February 20, 2011

सारांश - भाग १ - The Immortals of Melhua


बृहस्पती आणी शिवा (नीलकंठ) ह्या दोघांमधील हा संवाद:
बृहस्पती म्हणले, वैचारिक पातळीवर सोमरसाचे शरीरातील कार्य सुलभ असू शकेल, परंतू ही महान संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याचे कार्य मात्र ब्रह्मदेवाचे". Aging process काही औषधांनी पुढे ढकलणे कसे शक्य आहे ह्याचा अभ्यास करण्यापूर्वी आपण जिवंत का असतो? अशी कोणती मुलभूत बाब आहे जी आपणाला जिवंत ठेवते? बृहस्पती म्हणले, ही मुलभूत बाब म्हणजेच "उर्जा". जोपर्यंत व्यक्ती जिवंत असते तो पर्यंत बोलताना, चालताना, विचार करताना, कामे करताना आणी झोपेत देखील ह्याच उर्जेचा जिवंत राहण्यासाठी उपयोग होतो. ह्या उर्जेचे स्त्रोत काय? तर आपण जे अन्नपदार्थ सेवन करतो त्या अन्नाचे उर्जेत रुपांतर होते, ती शरीरात साठविली जाते. त्यामुळे काही दिवस आपण पूर्ण उपवास जरी केला तरी आपणाला अशक्त जरूर वाटेल, पण तरीदेखील आपण जिवंत असतो. अन्नपदार्थांपासून ही उर्जा वातावरणातील हवेतील प्राणवायू मुळेच निर्माण होते. त्यामुळे, अन्नपदार्थांचे सेवन करूनही, प्राणवायू अभावी उर्जा निर्माण होणार नाही आणी जिवंत राहण्यासाठी उर्जा नसल्यामुळे मृत्त्यू अटळ आहे. शिवा म्हणला," परंतू ह्या सर्वांचा, aging प्रोसेस, काही औषधांनी पुढे ढकलण्याशी काय संबध आहे?" बृहस्पती हसले आणी म्हणले, "हीच तर खरी गोम आहे, जो प्राणवायू आपणाला जिवंत ठेवतो तोच प्राणवायू aging process आणी मृत्त्यू साठी कारणीभूत आहे. जेव्हा प्राणवायू आणी अन्नपदार्थ ह्यांचा संयोग होवून एका रासायनिक प्रक्रियेद्वारे उर्जा निर्माण होते, त्याच प्रक्रियेतून oxidents हे free radicles शरीरात निर्माण होवून साठविले जातात. जसे लोखंडावर प्राणवायूची प्रक्रिया होवून oxidizing process द्वारे त्यावर जंग (rust) निर्माण होवून हळू हळू लोखंडाची गुणवत्ता कमी कमी होत जाते, एखादे फळ हवेत ठेवले तर ते फळही कालांतराने प्राणवायूच्या प्रक्रियेमुळे खराब होते, सडते, तशीच प्रक्रिया आपल्या शरीरात देखील होते. प्राणवायूच्या प्रक्रियेमुळे निर्माण झालेले हे oxidents हळूहळू शरीरातील पेशींवर विपरीत परिणाम करण्यास सुरवात करतात. लोखंडासारखे आपले शरीरही आतून गंजत जाते, हीच aging प्रोसेस, आणी त्याचा परिपाक म्हणजे मृत्त्यू. जो प्राणवायू आपणाला जीवन देतो तोच प्राणवायू हळू हळू आपणाला मृत्त्युच्या निकट नेत राहतो". ज्याप्रमाणे आपण अन्न, पाणी शरीरात साठवून ठेवू शकतो, ह्या गोष्टी मिळाल्या नाही तरी बरेच दिवस जिवंत राहू शकतो, पण प्राणवायू मात्र साठवून ठेवू शकत नाही, काही मिनिटातच प्राणवायू अभावी मृत्त्यू अटळ आहे. कदाचित साठविलेला प्राणवायू हे शरीरासाठी विष ठरेल म्हणूनच निसर्गाने ही किमया केलेली असावी.
बर्याच शास्त्रीय अभ्यासांती ब्रह्मदेवानी सोमरसाचा शोध लावला. सोमरस प्राशन केल्यानंतर शरीरातील oxidents सोबत ह्या सोमरसाची प्रक्रिया होवून हे प्राणघातक oxidents घामाद्वारे किंवा लघविद्वारे विसर्जित केले जातात. सोमरसाचे एका विशिष्ठ कालाविधीनंतर नियमित प्राशन केल्यास aging process आणी मृत्त्यू ही प्रक्रियाच लांबते हाच ब्राह्म्देवांचा शोध. अमिष ह्या कोलकाता येथील IIM संस्थेतून पदवी प्राप्त केलेल्या लेखकाने लिहिलेल्या "The Immortals of Melhua " ह्या पुस्तकातील वरील सोमरसाची पार्श्वभूमी.

राम हा एक सूर्यवंशीय रजा, ज्याने आपल्या प्रजेसाठी आचार विचारांची एक दिशा ठरवून दिली, ज्या प्रदेशात हे रामराज्ज्य अस्तित्वात होते त्या प्रदेशाला लेखकाने "meluha " म्हणून संबोधित केले आहे आणी राजधानी देवगिरी. सोमरसाचा शोध तर ब्रह्मदेवानी लावला परंतू त्याची निर्मिती कोठे करावी जेणेकरून त्याचा दूरूपयोग होणार नाही, म्हणूनच नीती आणी अचार विचारांनी परिपक्व असणारया सूर्यवंशीय meluha ह्या राम राज्ज्यातील मंदार पर्वताची निवड करण्यात आली. बृहस्पती हे ह्या निर्मिती कारखान्याचे प्रमुख. सोमरसाच्या निर्मितीसाठी आवश्यक वनस्पती, संजीवनी वृक्ष मंदार पर्वतानजीकच्या अर्रण्यात भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळेच ह्या जागेची निवड. फक्त सरस्वती नदीच्या पाण्याचाच उपयोग सोमरस निर्मितीसाठी होणार असल्यामुळे, मोठ्या कालव्याद्वारे सरस्वतीचे पाणी आणण्यात आले.

सोमरस सेवन केल्यानंतर बर्याच कालावधीपर्यंत विसर्जित होणारा घाम आणी मल- मुत्र ह्यात फार मोठ्या प्रमाणात oxidents असल्यामुळे, आणी ह्या विसर्जनाची योग्य विल्हेवाट न लावल्यास त्याचा शरीरावर आणी त्याच्या सान्निध्यात येणाऱ्या लोकांवर विपरीत परिणाम होणार हे जाणून, व्ययक्तिक स्वच्छता, रोज दोन वेळा स्नान करणे ही सूर्यवंशीयांची सवय, सांडपाण्याची मोठ मोठ्या बंद नाल्या निर्माण करून योग्य विल्हेवाटलावणे हे राजाचे कर्त्तव्य.
अभिमान वाटावे असे रामाने निर्माण केलेले सूर्यवंशीय राज्ज्य. नंतरच्या अनेक पिढ्यातील सूर्यवंशीय राजांनी ही परंपरा जोपासलेली, परंतू हळू हळू ही परंपरा नष्ट होईल काय ह्या भीतीने धास्तावलेले दक्ष (पुस्तकात रामाचा वंशज म्हणून दक्ष राजाचा उल्लेख आहे, दक्ष राज्याचे वय १८८ वर्ष आणी दक्ष राजाची पुत्री म्हणजे सती किंवा पार्वती - वय - ८८). भीती वाटण्याचे महत्वाचे कारण म्हणजे सरस्वती नदीच्या पाण्याचा सतत कमी होत असणारा स्त्रोत. शिवाय शेजारच्या चंद्रवंशीय आणी नागा राज्ज्यकर्त्यांचे सतत होणारे आक्रमण. ह्या सर्व परिस्थितीवर फक्त एकाच व्यक्ती तोडगा काढू शकेल ज्या व्यक्तीचा गळा सोमरसाचे सेवन केल्यानंतर निळ्या रंगाचा होईल. तिबेट मधील मानसरोवर परिसरातील क्षेत्रात अनेक आदिवासी टोळ्या राहत होत्या. अश्याच एका टोळीचा शिवा हा नायक. सूर्यवंशीय राज्याचे मुख्यालय म्हणजे देवगिरी (सात नद्यांचा हा प्रदेश - गंगा, यमुना, सरस्वती, सिंधू, ब्रह्मपुत्रा, शरयू आणी दक्षिणेची राज्याची हद्द म्हणजे नर्मदा). मेलुहा प्रदेशाचा प्रधान म्हणजे "नंदी" . तो शिवाला त्याच्या टोळीसह मेलुहा राज्यातील श्रीनगर येथे घेऊन येतो. सर्व पाहुण्यांना सोमरस दिल्यानंतर, फक्त शिवा सोडून सर्वाना फार त्रास व्हायला लागतो. फक्त शिवाला मात्र काहीच त्रास होत नाही, किंबहुना सोमरस पिल्यानंतर त्याचा कंठ नेहमीचा निळा होतो. हाच तो नीलकंठ, सूर्यवंशीयांना वाचविणारा, म्हणून नंदी त्याला देवगिरी राज्यात घेवून येतो. सोबत शिवाचा मित्र वीरभद्र हा देखील असतो.

आपण सर्वांनी ऐकलेल्या पौराणिक कथांच्या अगदी वेगळे असे हे कथानक. बर्याच गोष्टी अत्तर्क्य, अनाकलनीय, विश्वास न पटण्यासारख्या, तरी देखील, पुस्तकातील राम राज्याची, सोमरसाची संकल्पना विचार करण्यासारखी. आणी अगदी पहिल्या पानापासून वाचतच राहावं असे वाटणारे हे कथानक. सोमरसाची निर्मिती केल्यानंतर त्याचा दूरूपयोग होऊ नये म्हणून ब्रह्मदेवाने केलेली उपाययोजना आणी त्याच अनुषंगाने नंतर रामाने अमलात आणलेली चातुरवर्ण्य पद्धती ह्या बाबत वाचा माझा पुढील लेख ..

Saturday, February 12, 2011

उंदीर आणी प्रशासन


मंत्रालयातील सामान्य प्रशासन हा अतिशय महत्वाचा विभाग. श्री करडे, ह्या विभागातील एक अतिशय कर्मठ कर्मचारी. सेवानिवृत्तीला एक वर्ष राहिले असताना कक्ष अधिकारी म्हणून पदोन्नती झालेली. सर्व कायदे मुखोद्गत, कायद्याचा किडा म्हणूनच प्रसिद्धी. काम झाले नाही तरी चालेल पण कायदे, नियम मात्र पाळले गेलेच पाहिजे हा सततचा अट्टाहास. त्यामुळेच कोणाशीच न पटणारी ही व्यक्ती. सामान्य प्रशासन विभागातील भांडार म्हणजे एक मोठं कक्ष आणी त्यात ३०-४० racks, जुन्या पुराण्या असंख्य files त्यात ठेवलेल्या. ह्या साठी एक कक्ष अधिकारी आणी एक शिपाई एवढाच staff. फायीलींची आवक जावक आणी त्यांच्या नोंदी ठेवणे एवढेच काम. कोणालाच नको असणारया श्री करडे ह्यांना साहजिकच पदोन्नती नंतर ह्या भांडारात पाठविण्यात आले.

एक दिवशी सकाळी ११ वाजता आपल्या खुर्चीत बसले असता श्री करडे ह्यांना एक उंदीर दिसला आणी त्यांचे विचारचक्र सुरु झाले. कायदे आणी नियमाचा किडा ते, एक नस्ती (file ) घेतली आणी कागदावर लिहिण्यास सुरवात केली. " दिनांक .. वेळ . विषय: उंदीर आणी त्यामुळे शासनाचे होणारे संभावित नुकसान - आदरणीय महोदय, आज सकाळी खुर्चीवर बसलेलो असताना सकाळी ११ वाजून १७ मिनिटांनी एक उंदीर मला rack क्रमांक ९ समोरून निघून rack क्रमांक १० खाली गेलेला दिसला. ह्या कक्षात अनेक अतिशय महत्वाच्या files आहेत, हा उंदीर त्या files नष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मला सेवानिवृत्तीला फक्त १० महिने राहिलेले आहेत. ह्या files व्यवस्थित राखणे माझी नियम क्रमांक ..... नुसार जबाबदारी आहे. परंतू ह्या उंदरावर कोणतीही कार्यवाही करण्याचा नियम क्रमांक ..... नुसार मला अधिकार नाही. त्यामुळे ह्या विषयावर त्वरित कार्यवाही न झाल्यास आणी काही महत्वाच्या files नष्ट झाल्यास मी जबाबदार राहणार नाही. शेवटच्या ओळीवर लाल शाईने अधोरेखांकित केले. खाली आपली स्वाक्षरी केली. त्याखाली नियमानुसार सेवा जेष्ठतेनुसार अवर सचिव, उप सचिव, सचिव आणी प्रधान सचिव ह्याची नावे लिहिली. file ला "प्रथम प्राधान्य", "अति महत्वाचे", "तातडीचा निर्णय" "विशेष दुताद्वारे" असे ४-५ लाल रंगाचे tags लावले. शिपायाला बोलावून ही file तत्काळ अवर सचिवांकडे घेवून जाण्याचे आदेश दिले. शिपाई file घेवून अवर सचिवांच्या कक्षात गेला. सामान्यतः मंत्रालयात कोणत्याच file वर तातडीने निर्णय होत नसतो. ४-५ tags लावलेली file, शेवटचे फक्त लाल शाईने अधोरेखांकित केलेले वाक्य वाचले. विचार केला "काही तरी भंयकर प्रकरण दिसतंय, न वाचताच आपली लहान स्वाक्षरी केली आणी त्याच शिपायाला ही file उप सचिवांकडे घेवून जाण्याची सूचना दिली. " ह्या विषयावर त्वरित कार्यवाही न झाल्यास आणी काही महत्वाच्या files नष्ट झाल्यास मी जबाबदार राहणार नाही" हे लाल शाईने अधोरेखांकित केलेले वाक्य वाक्य पाहून वरील अधिकार्यांनीही न वाचता सही करून शेवटी शिपाई ही file घेवून प्रधान सचिवांच्या कक्षात गेला. त्यांनीही शेवटचे वाक्य वाचले आणी त्याखालील सर्वांच्या सह्या पहिल्या. इतर काहीच वाचले नाही. आता आपण निर्णय घेतला आणी फसलो तर? त्यांनी तत्काळ त्यांच्या हाताखालच्या अधिकार्याला पाचारण केले. file त्यांच्या अंगावर फेकली "मूर्ख, मी सचिव असताना अश्या files मी कधीच वरिष्ठांकडे पाठवत नव्हतो, मीच निर्णय घेत होतो. कशाला बसलात ह्या खुर्चीवर, मूर्ख, बेजबाबदार" शिव्या देवून हाकलून दिले. आणी नंतर हीच वर्तणूक आणी हेच वाक्य - उप सचिव, अवर सचिव ह्यांनी देखील त्याच प्रमाणे आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर ही नस्ती फेकून दिली. आणी सर्वात शेवटी शिपायाच्या अंगावर. बिचारा शिपाई ही file घेवून वापस आला. श्री करडे चहा पिण्यासाठी बाहेर गेलेले पाहून शिपायाने ही file साहेबांच्या खुर्चीतील उशीखाली दडवून ठेवली.

२ महिन्यानंतर श्री करडे खुर्चीत बसले असता त्यांच्या ढुंगनाला काही तरी टोचले. उशी वर करून पहिले तर ही file , त्याचीच एक टाचणी त्यांच्या ढुंगनाला टोचली होती. पुन्हा ४-५ नियम, कायदे ह्यांचा उल्लेख करून एक पानभर लिहून ही नस्ती वर पाठविली. शेवटी ही नस्ती प्रधान सचिवांकडे पोहचली. नस्ती वाचावीच लागली त्यांना. एक उंदीर आपल्या विभागात धुमाकूळ घालतोय हे त्यांना कळले. त्यांनी शेरा लिहिला " सामान्य प्रशासन विभागाकडे, उंदराच्या अपेक्षित कार्यवाही बाबत तांत्रिक ज्ञान असणारे अधिकारी नसल्यामुळे ही नस्ती तांत्रिक मार्ग्दर्षानाकरिता आणी योग्य उपाय योजना सुचविण्याकरिता संबंधित विभागांकडे पाठविण्यात यावी. आरोग्य विभाग, कृषी विभाग, warehouse corporation आणी defense ह्या चार विभागांची निवड झाली. पत्रव्यवहार सुरु झाला. आरोग्य विभागाचे अधिकार चौकशी साठी आले. त्यांचा अहवाल " आरोग्य विभाग उंदरांमुळे निर्माण होणारया रोगांच्या प्रतीबंधानाचे तथा उपचाराचे कार्य करते, उंदराला नाहीशे करणे ह्या विभागाचे काम नाही". कृषी विभागाचा चौकशी अहवाल " हा उंदीर घरगुती उंदीर होता कि शेतातील ह्याचा खुलासा करावा, शेतातील उंदीर असल्यास कृषी विभाग निश्चितच मार्गदर्शन करू शकेल". warehouse corporation चा अहवाल " आम्ही उंदीर मारीत नाही तर उंदीर आत येवू शकणार नाही असे warehouse बांधतो. आपल्या विभागाला असे भांडार निर्माण करावयाचे असल्यास आम्ही निश्चितच तांत्रिक सल्ला देवू" सुरक्षा विभाग थोडा समजदार असावा, अधिकारी न पाठवता त्यांनी उलट विचारणा केली " आकस्मिक स्थितीतच सुरक्षा विभाग नागरी विभागास मदत करू शकतो. आपल्या राज्यात आकस्मिक स्थिती जाहीर झालेली आहे काय? नसल्यास कृपया आकस्मिक स्थिती जाहीर करण्यासाठी माननीय राष्ट्रपती महोदयांना प्रथम विनंती करावी"

तो पर्यंत एक उंदीर धुमाकूळ घालतोय हे मंत्रालयात सर्वाना माहित व्हायला लागले. सर्व अहवालांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी महाबळेश्वर येथे दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ४०-५० अधिकारी सपरिवार उपस्थित होते. निर्णय झाला "ह्या उन्दरासाठी काय करावे ह्याची तांत्रिक माहिती आपल्या कोणत्याच विभागाकडे नसल्यामुळे परदेश प्रशिक्षण दौरा आयोजित करून ३-४ देशांना भेटी द्याव्या". ५ अधिकारी , ५ मंत्री आणी ५ आमदार असे सर्व ४ देशांचा १५ दिवसांचा परदेश दौरा करून परत आले. पुन्हा कार्यशाळा, चर्चा सुरूच राहिली. प्रत्येक विभागात काही असंतुष्ठ अधिकारी, कर्मचारी असतातच. त्यांनी ही सर्व माहिती गोळा करून विरुद्ध पक्षाच्या आमदारांना पुरविली. विधानसभेत आणी विधान परिषदेत प्रश्न विचारण्यात आले, अनेक तास चर्चा झाली, दोन वेळा सभात्याग झाला.

सेवानिवृत्तीला एक महिना राहिला असताना, शिपायाने श्री करडे ह्यांना ह्या उंदराच्या प्रकरण बाबत विचारणा केली. नस्तीतील सर्व माहिती नियम आणी कायद्यासह श्री करडे ह्यांनी शिपायाला समजावून सांगितली. शिपाई म्हणाला, " अर्रेचा, हाच तो उंदीर होता काय? साहेब आपणाला ज्या दिवशी तो उंदीर दिसला त्यानंतर २-३ दिवसांनी मी दरवाज्याजवळ स्टूल वर बसलो होतो, मला तो उंदीर आलामारीखाली दिसला, हातात झाडू घेवून दबा धरून बसलो, थोड्या वेळाने तो पुन्हा बाहेर आला, एका झाडूतच त्याला मारला आणी बाहेर फेकून दिला". श्री करडे, अरे त्या उंदराची केस सुरु असताना तू त्याला कसा मारलास? त्यांनी पुन्हा कायदे, नियम लिहून नस्ती तयार करून वर पाठविली आणी शेवटी चौकशी सुरु असणारया उंदराला मारले म्हणून शिपायाला निलंबित करण्यात आले.

प्रशासन आणी व्यवस्थापन हे दोन शब्द आपण नेहमीच ऐकत असतो. प्रशासन म्हणजे कायद्याच्या, नियमांच्या चौकटीत राहून कार्य करणे. तर व्यवस्थापन म्हणजे उपलब्ध मनुष्यबळ, सामुग्री आणी पैसा ह्यांचा योग्य विनियोग करून अपेक्षित उद्धेश अपेक्षित कालवधीत साध्य करणे. अपेक्षित उद्धेश साध्य करणे हे व्यवस्थापनाचे महत्वाचे कार्य, प्रशासनाचेही तेच कार्य आहे, परंतू उद्धेश साध्य करण्याकडे प्राथमिकता न देता कायदा आणी नियमांचा कीस पडून, फक्त कायद्याच्या, नियमांच्या चौकटीत राहून कार्य करणे हा शासकीय दृष्टीकोन. उंदीर हा जर problem होता तर माझ्या दृष्टीने तो शिपाई एक चांगला व्यवस्थापक होता कारण त्वरित निर्णय घेवून त्याने हा प्रोब्लेम सोडविला होता. पण प्रशासन बघा, बक्शिश तर सोडाच, चौकशी सुरु असणारया उंदराला मारले म्हणून त्यालाच निलंबित व्हावे लागले. ह्या प्रसंगाकडे एक हास्यास्पद कथा म्हणून न बघता, अनावश्यक कालाप्यव्यय, पैश्याचा अनाठायी खर्च टाळण्यासाठी प्रशासन आणी व्यवस्थापन योग्य रित्या समजून आपला उद्धेश कश्या प्रकारे साध्य करता येईल ह्याकडे लक्ष देवून अधिक जाणीवपूर्वक कार्य करणे महत्वाचे ठरते.

Friday, January 28, 2011

आत्महत्त्या



आत्महत्त्या


  • २२ वर्षीय विवाहित महिलेची अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेवून आत्महत्त्या - संभाव्य कारण "हुंडा"
  • विषप्राशन करून २ शेतकऱ्यांची आत्महत्त्या - ? कर्जबाजारी
  • दिराच्या लैंगिक छळवादाला कंटाळून फाशी लावून नवविवाहितेची आत्महत्त्या
  • २ कॉलेज विध्यार्थांची हाताची नस कापून आत्महत्त्या - प्रेमातील अपयश - संभाव्य कारण
  • ७ व्या माळ्यावरून उडी मारून एका तरुण म्यानेजर ची आत्महत्त्या - कामातील असःह्य झालेला ताणतणाव
  • एका हॉटेल मध्ये नवविवाहित जोडप्याची झोपेच्या गोळ्या खावून आत्महत्त्या - संभाव्य कारण "अंतरजातीय विवाह"
  • चालत्या गाडीतून उडी मारून एका तरुणाची आत्महत्त्या - संभाव्य कारण " लैंगिकदृष्ट्या असमर्थता"
  • समुद्रात बुडून एका व्यापाऱ्याची आत्महत्त्या - संभाव्य कारण " मित्राने केलेली फसवणूक आणी धंद्यात खोट"
  • वेल्लोर मेडिकल कॉलेज मधील एका कौनसिलर ची आत्महत्त्या - सतत परामर्श देताना झालेला असःह्य ताणतणाव

वर्तमानपत्र वाचताना किंवा टीवी बघताना सातत्याने दिसणाऱ्या ह्या बातम्या. २००९-२०१० चा गुन्हे विभागाचा अहवाल - गेल्या दशकात आत्महत्येचे प्रमाण १ लक्ष लोकसंखेमागे ८.४७ वरून ११.२७ इतके वाढलेले. अहवालानुसार एका वर्षात ११०५८७ आत्महत्यांची नोंद. दररोज ३१० आणी प्रत्येक ५ मिनिटाला एका आत्महत्येची नोंद. सर्वसाधारणपणे पुरुष आणी स्त्रया ह्यांचे आत्महत्येचे प्रमाण १.२ मागे १.००, परंतू १५ ते २९ वयोगटात हेच प्रमाण ०.८ मागे १.५. दूरदैवाची बाब म्हणजे केरळ सारख्या भारतातील सामाजिक - सांस्कृतिक पुढारलेल्या आणी १००% स्त्रियांची साक्षरता असणाऱ्या राज्यात हेच प्रमाण १ लक्ष लोकसंखेमागे ३१. आणी सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या बंगलोर शहरात हेच प्रमाण १ लक्ष लोकसंखेमागे ३४. अंगावर शाहरे आणणाऱ्या ह्या बातम्या आणी ही आकडेवारी. खरोखरच आम्ही सुशिक्षित, सकारात्मक विचारसरनीचे झालेलो आहोत काय? आणि ही आकडेवारी फक्त नोंदी झालेल्या घटनांची, पोलिसांच्या आणी इतर अनेक दबावांमुळे कितीतरी घटनांची नोंदच होत नाही, ही वस्तुस्थिती. कदाचित एका मोठ्या हिमनगाचा हा एक वरवर दिसणारा भाग. आत्महत्येने नोंद झालेल्या मृत्यूंच्या १० ते २०% जास्त आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांचे प्रमाण, आणी ३०-४०% जास्त आत्महत्येचा विचार सतत मनात असणारयांचे प्रमाण (अश्या व्यक्ती त्यांच्या कामांवर संपूर्ण लक्ष केंद्रित करून, त्यांच्या कडून अपेक्षित असणारे कार्य करू शकतील काय? त्याचा विपरीत परिणाम देश्याच्या सर्वांगीण प्रगतीवर होईल काय?) . एक शास्त्रीय आकडेवारी. खरोखरच भयंकर आहे ही आकडेवारी. आणी, असं कां घडाव हा एक मोठा यक्षप्रश्न?

कौटुंबिक समस्या, लैंगिक समस्या, सामाजिक - सांस्कृतिक - आर्थिक समस्या, दीर्घ आजार, मानसिक आजार, बेरोजगार, कामाच्या ठिकाणी सतत असह्य होत असलेला ताणतणाव, खाजगी क्षेत्रात कार्य करताना अपेक्षित कामाची सततची मागणी आणी त्यातून निर्माण होणारी विफलता, विशेषतः खाजगी क्षेत्रात कार्य करताना नौकरिची सतत अशास्वती, प्रेमभंग, परीक्षेतील अपयश, लैंगिकतेवर आधारित स्त्रियांवर होणारे अत्त्याचार ... ही सर्व साधारणपणे नोंद झालेली आत्म्हत्त्येची कारणे. परंतु ह्या सर्वामागील पार्श्वभूमी, मुलभूत कारणे, आत्म्हत्त्येस प्रवृत्त करणारी परिस्थिती कदाचित वेगळीच असू शकेल, त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे काय? कारण अनेक वेळा पोलीस नोंदीत असणारया कारणांवर आपलाच विश्वास बसत नाही.

आरोग्य हा जर प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे, आणी, आरोग्याच्या व्याखेत जर मानसिक आरोग्याचा समावेश आहे, तर खऱ्या अर्थाने आपण स्वतः आरोग्य म्हणजे काय हे समजून घेतो काय आणी ते प्राप्त करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो काय? आत्महत्येचे वाढते प्रमाण हे समाजाच्या खालावलेल्या प्रवृत्तीचे द्योतक आहे. एकीकडे सगळीकडे दिसणारी/ जाणवणारी सामाजिक - आर्थिक उन्नती तर दुसरीकडे आत्महत्येचे वाढते प्रमाण, हा एक मनाला न पटणारा विपर्यास.

जर आत्म्हत्त्येस जबाबदार असणारे सकृतदर्शनी कारण, त्या मागील पार्श्वभूमी, सामाजिक - सांस्कृतिक - आर्थिक समस्या, ह्या सर्वांचा विचार केल्यास, एका करणामागील अनेक उपकारणे, प्रत्येक उपकारणांची पुन्हा उपकारणे, ह्या सर्वांचा विचार करून, वर्तनुकिंची एक समजून उमजून दिशा निश्चित कारणे आणी त्या प्रमाणे सातत्याने वर्तणूक अंगीकार करणे आवश्यक ठरते. बरेच वेळा आत्महत्त्या करणाऱ्या व्यक्तीत त्याच्या वागण्यात काही बदल झालेले जाणवू शकतात. त्यावर वेळीच उपाय योजना केल्यास ही आत्महत्त्या टळू शकते. आपल्या कुटुंबात, मित्र मंडळीमध्ये , कार्याचे ठिकाणी, आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीत जाणविणारे खालील बदल भविष्यातील धोक्याची घंटा ठरू शकतात:

  • नेहमीच्या वर्तणुकीत अचानक जाणवणारा बदल, झोप न लागणे किंवा खूप वेळ झोपतच राहणे
  • आपल्या कामावर लक्ष केंद्रित न करणे
  • विनाकारण चिडचिड, निराशा, वैफल्यता, इतरांपासून एकटे राहण्याची प्रवृत्ती, अचानकच जडणारी व्यसनाधीनता.
  • जीवनात काहीही ठेवले नाही, माझी कोणालाच गरज नाही, सर्व माझ्या विरोधातच आहेत, मी कोणाच्याच उपयोगाचा राहिलेलो नाही, मला आत्महत्त्या करावीशी वाटते, अश्या प्रकारची सतत भाषा वापरणे.

ह्या अश्या प्रकारच्या वर्तणुकीतील बदल जाणवल्यास, सर्व प्रथम अश्या व्यक्तींचे शांत पणे ऐकून घेणे, कारण शोधण्याचा प्रयत्न करून त्या करिता काही करता येईल काय हा विचार करणे, अश्या व्यक्तींना शक्क्यतोवर एकटे न सोडणे, योग्य परामर्शदात्याची भूमिका वठविणे, गरज भासल्यास मानसिकतज्ञ सल्ला, आणी सर्वात महत्वाचे, अश्या व्यक्तीची टिंगल टवाळी न करणे अतिशय महत्वाचे ठरते.

आत्महत्त्या टाळण्यासाठी समाजाने, इतरांनी, कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्यांनी, घरातील वडील व्यक्तींनी, आरोग्य विभागाने काय करायला हवे, कसे वागायला हवे, ह्यावर न संपणारी चर्चा न करता, "मी एक व्यक्ती म्हणून काय करू शकतो, ते सर्वस्वी माझ्या हातात आहे असा विचार करून, मी प्रथम माझ्या वर्तणुकीत कसा बदल घडवून आणेल, ह्याचे आत्मपरीक्षण करण्याची जास्त गरज आहे. तसेच मी एक चांगला परामर्शदाता कसा ठरू शकेल, ह्याकरिता जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. अशी दुर्दैवी घटना माझ्या कुटुंबात देखील घडू शकेल आणी हे टाळण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची गरज